५०लाख शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी
५० लक्ष शेतकरी खातेदारांनी केली ई-पीक पाहणी - ई पीक पाहणी प्रकल्पाला शेतकरी खातेदारांचा चांगला प्रतिसाद - महसूल मंत्री श्री, बाळासाहेब थोरात
महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी मोबाईल ॲप ला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यात दिनांक १९ सप्टेंबर अखेर ५० लक्ष ३० हजार खातेदार शेतकरी यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲप चा वापर केला आहे . या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
श्री. थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सातबारावर पीक पाहणीची अचूक नोंद होण्यासाठी राज्य शासनाने ' माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा' ही मोहीम हाती घेतली आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत पन्नास लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले असून या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी देखील नोंदविली आहे. महाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा व्यापक प्रकल्प असून हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होत आहे या मध्ये पिकाची माहिती , जल सिंचनाची साधने विहिरी, बोअरवेल, गोडावून, जनावरांचे गोठे, कांदा चाळी, ठिबक सिंचन, शेततळे यांच्या देखील अचूक नोंदी सहज करता येत आहेत त्यामुळे याॲप शेतकरी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पध्दत आहे. ई- पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांची अचूक माहिती शासनाकडे उपलब्ध होते , अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होईल . शिवाय या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज , पीक विमा मिळणे देखील सुलभ होणार आहे तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल केला जात आहे. ई- पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र शासनाला समजण्यास मदत होणार असल्याने शेतीचे अधिक चांगले नियोजन करणे शासनाला शक्य होणार असल्याचे महसूलमंत्री म्हणाले.
राज्यातील नाशिक विभागातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक प्रतिसाद ई-पीक पाहणी ॲपला दिला असून अमरावती विभागात देखील चांगले काम झाले असून सर्वात कमी प्रतिसाद कोकण विभागात मिळत आहे . दररोज सुमारे दोन लक्ष पेक्षा जास्त शेतकरी ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून वापरतात. खरीप हंगामाची ई -पीक पाहणी करण्यासाठी शेवटचे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. राज्यातील ४४२६५ महसूल गावांपैकी ४१६२४ महसुली गावातील ५० लक्ष ३२ हजार खातेदार शेतकरी यांनी ६० लक्ष ६० हजार स.न. मधील ई पीक पाहणी झाली आहे उर्वारीत खातेदार यांनी तातडीने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई फेरफार व ई पीक पाहणी प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे
Comments