संगणकीकृत 7/12 मधील त्रुटी दूर करणे साठी करावयाचे कार्यवाही बाबत दि.११.०६.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
विषय:- संगणकीकृत 7/12 मधील त्रुटी दूर करणे साठी करावयाचे कार्यवाही बाबत .
शासनाचा ई फेरफार हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात असून या अंतर्गत राज्यभरातील सुमारे अडीच कोटी 7/12 चे संगणकीकरण पुर्ण करण्यात आले आहे.
तथापि या प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अथवा टंकलेखनीय प्रक्रियेमुळे काही 7/12 मध्ये आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी दि.५/५/२०१७ च्या परिपत्रकान्वये चावडी वाचनाची विशेष मोहिम घेण्यात आली होती.
या मोहिमेअंतर्गत निदर्शनास आलेल्या संगणकीकृत 7/12 तील त्रुटी दूर करण्यासाठी रि-एडिट मॉडयुल द्वारे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.
तथापि रि-एडिट मॉडयुल मधील काम पुर्ण करुन ज्या गावामध्ये घोषणापत्र-३ तहसिलदार यांनी दिले असेल त्या गावातील कोणत्याही 7/12 मध्ये काही संगणकीय अथवा तांत्रिक अडचणींमुळे काही त्रुटी/दोष राहिले असल्याचे संबंधीत खातेदार यांनी निदर्शनास आणुन दिल्यास ते दूर करण्यासाठी खालीप्रमाणे कालबद्ध कार्यवाही करावी.
१. घोषणापत्र-३ झालेल्या गावामध्ये कोणत्याही संगणकीकृत 7/12 मध्ये हस्तलिखीत 7/12 तील कोणताही तपशील अचुकरित्या परावर्तीत केला गेला नसल्यास (तलाठ्याने संगणकीकृत ७/१२ हस्तलिखित ७/१२ शी तंतोतंत जुळविला पाहिजे ) व अशी बाब संबंधीत खातेदाराने हस्तलिखीत 7/12 च्या पुराव्यासह संबंधीत तहसिलदार यांच्याकडे त्रुटी दूर करण्यासाठी असा लेखी अर्ज करून निदर्शनास आणावी .
२. असा अर्ज प्राप्त झाल्याबरोबर संबंधीत तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार (DBA) यांचे थेट नियंत्रणाखाली ठेवलेल्या विशेष नोंदवहीमध्ये नोंदवून संबंधित अर्जदारांना पोहोच द्यावी.
३. अशा प्राप्त अर्जात नमुद केलेली वस्तुस्थिती बाबत जुन्या अभिलेखावरुन पडताळणी करुन व गरजेप्रमाणे सुनावणी घेवून हस्तलिखीत 7/12 मध्ये असलेला कोणताही तपशील त्यानंतर झालेल्या कोणत्याही फेरफाराशिवाय संगणकीकृत 7/12 मध्ये आला नसल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 मधील तरतुदीप्रमाणे ही त्रुटी/दोष लेखनप्रमादाची चूक असे समजुन योग्य ते आदेश तहसिलदार यांनी पारीत करावेत. (ज्या जिल्हयात ते अधिकारी नायब तहसिलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत तेथे नायब तहसिलदार यांनी ते आदेश पारीत करावेत.)
४. वरीलप्रमाणे प्राप्त आदेशान्वये संबंधित तलाठयाने ई-फेरफार प्रणालीतुन रितसर फेरफार नोंदवून तो मंडल अधिकारी यांनी प्रमाणित करावा व आदेशाप्रमाणे संगणकीकृत 7/12 दुरुस्त करण्यात यावा. ज्या प्रकरणी सुनावणी आवश्यक नाही त्या प्रकरणी सदरची प्रक्रिया अर्ज प्राप्त झाल्यापासुन ३० दिवसात व ज्या प्रकरणी सुनावणी घेणे आवश्यक आहे त्या प्रकरणी ६० दिवसात ही कार्यवाही पुर्ण करण्याची जबाबदारी संबंधित तहसिलदार यांची राहील.
५. ज्या ठिकाणी खातेदारांनी धारणकेलेले क्षेत्र व एकूण क्षेत्र यांचा मेळ बसत नाही तेथे जुने अधिकार अभिलेख व आकारबंद यांचा मेळ घेऊनच योग्य ती दुरुस्ती करावी . अशी लेखनप्रमादाची चूक दुरुस्त करण्यासाठी खातेदाराना अनावश्यक त्रास सहन करावा लागणार नाही ह्याची दक्षता घ्यावी .
वरीलप्रमाणे कार्यवाही आपले उपविभागात/जिल्हयात होत असल्याची खात्री उपविभागीय अधिकारी/ जिल्हाधिकारी यांनी नियमित आढावा घेवून करावी.
या प्रमाणे परिपत्रक प्रस्तावित आहे . वाचून अभिप्राय द्यावा .
आपला
रामदास जगताप
दि.११.०६.२०१८
SIR CIRCULARS ARE NOT BEING DOWN LOADED
ReplyDelete